Tuesday, 23 January 2018

घाव

तुझ्या अंगणातल्या कोपऱ्यात 
एक कुंदाच्या फुलाचं झाडं होत.!
आठवते का तुला..?
माझ्या आठवणी अजूनही तश्याच-
सकाळी अंगणातील फुलं गोळ्या करण्याची धडपड,
त्याच फुलांच्या सुगंधात मी त्या झाडाचं फुलं बनली..    

तुझ्या समाजानी काय केलं सांगू?
ते झाड तोडून टाकलं..कुऱ्हाडीनी..!! 
आणि तू,
हसत हसत स्विकारलाही तो घाव..?

तुझी हाडं,
जी मी वाकवली असा आरोप तू करतोय ना..
ती त्या कुऱ्हाडींनी वाकवली.. मी नाही..!!

मी फक्त वाकलेल्या तुला आधार देऊ शकत नाही..!!
किंवा अशे म्हण कधी देणारही नाही..!!-इच्छाच नाही..

कारण,
मीही शेवटी,
त्या कुंदाचं-एक फुलं ..!  
तुला भार होऊ नये म्हणून झाडावरून गळून पडलेलं..!!


...वैष्णवी.. 
#एक_सावली    

Wednesday, 17 January 2018

बंद दरवाज्यामागे

आधुनिकतेचा पुळका चढलेल्या पार्टीत 
कुजलेल्या विचारांमागे,
लपवत आहे हा समाज,
त्याची फाटलेली लक्तरे..!
जसा बंद दरवाज्यामागे 
तू लपवला आहे, 
तुझ्यातला- 
अमानवी मानव..!!


...वैष्णवी.. 
#एक_सावली   

Thursday, 11 January 2018

तुझ्याचसाठी..

आजची कविता,
गर्दीत मागे बसलेल्या तुझ्यासाठी..
कोण..? कुठे..? म्हणत-
मागे वळून पाहणाऱ्या तुझ्याचसाठी...

शब्द-शब्द जागवून माझ्यातला
स्वतः मध्ये सामावण्यासाठी..
अन तरंगणाऱ्या भावनांना
आहे तस समजण्यासाठी...

मुखवटा काढून माझा
कुरुपते सहीत स्वीकारण्यासाठी..
नकळत माझं 'मी'पण
तुझ्यात जपण्यासाठी...

आजची कविता
माझ्यातल्या तुझ्यासाठी..
आजची कविता
फक्त तुझ्याचसाठी...


...वैष्णवी..
#एक_सावली

Wednesday, 10 January 2018

ध्येय..?

तीचा फोन येतो!
स्वप्न, ध्येय, यश वैगेरे-
आठवून दिले जातात...
पण-
उडायला सांगून
बांधून ठेवलेल्या पंखांच कसं..?
जगण्याच्या धडपडीतच
विस्कटलेल्या जगण्याचं कसं..?
आतमध्ये तुटलेल्या
माणसाचं कसं..?
ध्येयाकडे धावतानाच्या स्पर्धेत
सुटलेल्या हातांच कसं..?
त्याही-पेक्षा
जिवंतपणीच मेलेल्या माझ्यातल्या
'मी'च कसं..?

....वैष्णवी...
#एक_सावली

Sunday, 7 January 2018

नाळ

खरं तर,
तू माझ्या जवळ येऊन रडावं
असं काहीही झालेलं नव्हतं.!
तुला विळखा घातलेल्या सापाची,
ताकद तेवढी समजली.!
खूप कीव येते अरे..!!
तुझ्या पडलेल्या विचारांची!!
तुझी ही बाजू समजण्यासाठी-
माझी जन्माची नाळ तोडावी लागली!!
माझ्या-तुझ्या नात्यापेक्षा-
तुझ्यात उतरलेलं समाजातील जातीचं, 
विष जास्त प्रभावी ठरलं..!
खंत वाटते-
तुझ्या मगरीच्या अश्रूमुळे,
क्षणासाठी मीही ढळली... 
पण, रक्ताचा राजकारणी तू.. 
माझ्या भावनेच जातकारण केलंस.... 
आणि,
क्षणार्धात मी होत्याची नव्हती झाली..!
खरं सांगू?
तू माझ्या जवळ येऊन रडावं
असं काहीही झालेलं नव्हतं.!

...वैष्णवी..


Monday, 25 December 2017

ओझं



तुझ्या नजरेतून,तुझाच समाज पाहते आहे
माझ्या स्वप्नांना,उडण्याआधी तुटताना पाहते आहे 

घृणास्पद जाती परंपरेत,अडकला आहेस तू 
त्यात माझा बळी, तूच देताना पाहते आहे 

माझ्या प्रेतयात्रेसाठी, माझं घर जाळलं ज्या समाजानी 
त्या गर्दीत, तू मलाच जिवंतपणे जाळताना पाहते आहे 

तुझ्या डोळ्यातल्या पाण्याने, पुन्हा हा समाज जिंकला 
उंबरठ्याच्या विळख्यात, माझा जीव गुदमरताना पाहते आहे 

मला तुझ्यावर जिंकायच नाही आहे - बिलकुल 
माझ्या जखमेसोबत, मी स्वतः जगताना पाहते आहे 

शेवटी, तुझी मान ताठ ठेवण्याच्या ओझ्याखाली 
माझी मान मी स्वतः, झुकताना पाहते आहे 


...वैष्णवी ..

Sunday, 19 November 2017

अलगद

माहित आहे.? आमच्या गावाकडे न दुसऱ्या बाईसोबत (बायको सोडून) बाहेर फिरणाऱ्या माणसाला लफंगा / लोफर म्हणतात आणि नवरासोडून दुसऱ्या पुरुषासोबत संबंध प्रस्थापित करणाऱ्या स्त्रीला कुलीटिनी म्हणतात. बहुदा, आज मी खूप लोकांच्या जखमेवर हात लावणार आहे..

विषयाची सुरुवात कुठे झाली ते आधी सांगते. कालपरवा माझ्या वडिलांशी होत असलेल्या संवादाचा शेवट-
मी, "मला लग्न नाही म्हणजे नाहीच करायचं, विषय इथेच संपला!"
माझा बाप, "का पण ?"
बस.! माझ्या बापाचा "का पण ?" डोक्यात चालेल्या गोंधळाला पूर्ण विराम द्यायला पुरेसा होता.

" लग्न " हा शब्द मला व्यक्तिशः खूप पवित्र वाटतो. उच्चारुन पहा एकदा " लग्न ". अगदीच " अलगद " वेगळीच गुदगुल्या वगैरे देणारी भावना शब्दातच दडली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये लग्न म्हणजे फक्त विधी-सोहळा नाही. लग्न म्हणजे भावना आहे. समोरच्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातील अर्धांगिनी वा सहसोबती - नवरा बनवण्याची भावना, प्रत्येक छोट्यातील-छोटी सुख-दुःखे सोबत अनुभवने म्हणजेच लग्न. मला वाटतं नवरा-बायको म्हणजे नातं नसतं,लग्न म्हणजे नातं असतं... 

खूप जुनाट विचार वाटतो आहे का?  कारण अश्या लग्नात बंधने जाणवतात. आजकाल ट्रेंड मध्ये असलेली स्पेस (मोकळीक)नसते, one night stand  वगैरे संकल्पनाच नसते. फक्त ती किंवा तो आणि तुम्ही..! काळानुसार लग्नाची व्याख्या बदलली आणि सोहळ्यासहित होणाऱ्या प्रथा आता show off झाल्यात; बरं इथपर्यंत सर्व ठीक आहे, पण " लग्न " या नात्यातला अर्थ बदलला. आधी जी पवित्रता म्हणून बघितल्या जायचं तो दृष्टिकोन जुनाट म्हणून गणल्या जातो.आता लग्न म्हणजे भावनिक कमी आणि प्रॅक्टिकल फार झालंय.

लग्नाच्या १०-१२ वर्षानंतर तुम्हाला एक मुल असतानाही तुम्ही नवऱ्या व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित कशे होऊ शकता?  फार विचार करण्यासारखी बाब आहे असं मला सारखं वाटायचं, पण तीच स्त्री किंवा तोच पुरुष, 'अरे आता हे कॉमन आहे सर्वीकडे असंच चालतं' किंवा 'क्षणिक होतं ते -प्रवाहात वाहून गेलो ', अशी उत्तरे देतात तेव्हा रक्त असं फार उसळून येतं.

जेव्हा तुम्ही लग्नात एकमेकांशी बांधले जाता ना; तेव्हा नाही तुमचं मन विचलित होत, नाही तुम्हाला कुठला प्रवाह वाहून घेऊन जात..!  कारण जर लग्न तुम्हाला खरंच समजले असेल तर ते तुम्हाला "अलगद" जपतं.. अगदी तुमचे बाहेरचे प्रकरण माहित असतानाही तुम्हाला कुशीत घेऊन डोळ्यातील दाटलेले पाणी ती "अलगद" लपवते ना तसं.. 


...वैष्णवी..
#एकसावली #जगण्याचीधडपड