कविता लिहित असताना असे कळले काही
माझ्यात निरागसपणा काहीच उरला नाही
आरडा ओरडा करत खेळत असलेले त्या लहान मुलांकडे लक्ष गेलं
आणि
एरवी प्रमाणे डोक्यात सैरा वैरा धावणाऱ्या विचारांना बाजूला
करण्याचा बहाणा मिळाला,
(तसं एवढं सोपं नसतं ते, पण असो )
कॉलनी मधली मुलं क्रिकेट खेळत होती.
बॅटिंग करत असलेल्या मुलाने चौकार मारला
आणि तिथे असलेल्या सर्व मित्रांना
(कदाचित जवळच खेळत असलेल्या त्याचा मैत्रिणीला सुद्धा )
ऐकू जाईल अश्या आवाजात बोलला,
“१६ रन होते १७, १८, १९, २० झाले रे..”
कदाचित वरती सैरा वैरा धावणारे विचार खऱ्याने आता बाजूला झाल्या सारखे वाटले.
(पण हा आनंद जास्त काळ टिकणारा नव्हता )
एक प्रश्न डोक्यात आला,
हा निरागसपणा आपल्यातून विरघळून गेला आहे का.?
माझ्या किंवा तुमच्या मनात १६ अधिक ४, २० होतात असं फटकन उत्तर येतं,
मधली मोजणी करायला, आपण कधीच मोठे झालो आहोत.
अर्थात काहींना याचा गर्व सुद्धा असेल.
माझ्या मोठेपणाचा प्रवास
शिकवणी मधले मास्तर,वाढता वर्ग, सुधारित अभ्यासक्रम ,calculator,संगणक असा जास्त झाला .
यांनी माझ्यातला निरागसपणा एखादा vacuum cleaner कचरा ओढून घेतो तसा संपवून टाकला.
मोजण्याची सवय लावली आहे या दुनियेने.
गुण, टक्के, पैसे, वजन,
या गोष्टींमध्ये एक एक पाऊल चालण्यात अर्थच राहिला नाही.
उंच उडी, झेप ,झोका , भरारी
आणि ना जाने कितीतरी फालतू शब्द प्रेरणा देतात म्हणे हे सगळं मिळवण्यासाठी
(सोडा हे सगळा, कुणालाच न सुटलेलं कोडं मी एका कवितेत कुठनं सोडवणार आहे)
असा विचार करत असताना त्या मुलां कडे माझं पुन्हा लक्ष गेलं
आणि पुन्हा त्याच मुलाने त्याच्या मित्राला विचारले "किती वाजले रे ?"
घड्याळ बघत तो हळूच म्हणाला “लहान काटा ७ वर अन मोठा बारा वर” आणि आवेगाने बोल ला “७ वाजले, अजून थोडा वेळ खेळू शकतो”
मी माझी घड्याळ बघितली आणि माझ्याच मनातला आवाज मलाच चिडवत म्हणाला
कविता लिहित असताना असे कळले काही,
माझी घड्याळ तर धावायला सांगते , वेळ सांगत नाही
सौजन्य:
-वैभव गुणवंत भोयर
vgb3333@gmail.com