Friday 24 October 2014

प्रेमवेद

स्वप्नी तुझ्या प्रत्यक्ष यायचे स्वप्नं मी पाहत असतो
तुही कधी अशीच बोलावशील, वाट मी पाहत असतो.

कुरळ्या केसातून तुझ्या पाण्याचे थेंब घसरतात
साला दैनिकात यांचे नशीब मी शोधत असतो.

पतंग आडवी गेली म्हणून सुर्य लपत नसतो कधी,
नजरेत येता  असे काही तुझा होकार मी आठवत असतो.

पावसाच्या मोतेरी थेंबांसारखा विषय आहे तुझा
घ्यावं  भिजून कि लिहून घ्यावं  , पेच मी  सोडवत असतो.

तुझ्या खांद्यावर  डोके ठेवून लिहायचे आहे मला
असे कितीतरी बहाणे मी नेहमी शोधत असतो.

तुझ्या कवितेत दंगल पेटते शब्दांसोबत लिहिताना
ते अर्थ सोडत नाही, कचऱ्यात त्यांना मी  फेकत असतो.

तुला दुरून दिसला तो समुद्र तरीही चालेल
शब्दांचा पुल बांधण्या एक भाषा मी जोडत असतो.




वैभव गुणवंत भोयर
vgb3333@gmail.com




अर्धी राहीलेली कविता..

विस्कटलेले केस,
पदरही ढळलेला.!
दार उघडले,पण
ओळखलेच नाही तिला..!

एकही शब्द न बोलता
चालली होती पाठमोरी..!
मुक्याने जाणारी तिच असणार
तेव्हा ओळख पटली खरी..!

"सखये, का अशी,
निघून जाणार..?
मला अधांतरी पुन्हा
तात्कळत ठेवणार..?"

शब्दांनी माझ्या,
ती थबकली..!
परतणारी पावले,
परत वळली..!

डोळ्यात तिच्या जरी
तिरस्कार होता.!
मिठित मला घ्यायचा
आवेगही दाटला होता.!

राग तिचा अश्रूत
होता विरघळला.!
विरघळण्याचा डाग आजही
डायरीने आहे लपवला.!

मिठित येउन पुटपुटली
बये.! दूर पुन्हा लोटू नको.!
हवं तर माजघरात कोंडून ठेव
पण या जगात मज विकू नको.!

खिन्न मी,
तिला घरात आणली..!
हिला कुठल्या अलंकारानी सजवावी,
वॄत्त आणि मात्रांचीही गर्दी दाटली..!

तिच्यावर घालणार् या बंधनांची
चाहूल लागली असावी बहूधा..!
उठली संतापून, बोलली घालून-पाडून
आणि निघून गेली-पुन्हा एकदा..!

जाता जाता सांगायला
ती विसरली नाही..!
तुझी कविता कधीच
पुर्ण होणार नाही..!

शब्द तुझ्यात अडकणारा
तुला सापडणारा नाही..!
अडकलाच एखादा
तरी तो रुजणार नाही..!

अर्ध्या राहीलेल्या कवितेचे शब्द
तेव्हापासून भटकत आहे..!!
अन् कवितेच्या आठवणीत
डायरीची झुरणे सुरु आहे..!!


Thursday 23 October 2014

कुठलाही नियम मी कधी पाळला आहे..??

आंधळा विश्वास ठेवून,स्वतःला फसवले आहे
निर्भिड अगदी मी, कुर् हाडीवर पाय ठेवला आहे

होउन जाउ दे, जे व्हायचे ते आता,
जे होऊ नये ते तशेही झालेच आहे

हीच मजा असावी जगण्याची खरी,
डोळ्यांवर पट्टी बांधून मी जी भोगत आहे

विश्वास, अपेक्षा वैगेरे शब्द जड होतात हो,
कुठलाही नियम मी कधी पाळला आहे..??


कोपर् यातली पणती हळूच हसली

आपल्या नात्याला,
कुठल्या गैरसमजीने दुरावा आला..??
कारणमीमांसा नकोच..!
एकाच घरात वावरणारी,
अनोळखी झालोत, नाही..?
सावली म्हणायचा तू मला
तुझ्यापासून कधीही वेगळी न होणारी-सावली..!
पण इतक्यात-मुद्दाम होऊन दूर राहतोय
वेदना होतेच,
आणि का होऊ नये.?
दोन जीव,एक प्राण वैगेरे होतो ना रे आपण..!!
......
दिवाळी! नाही का आज,
सर्व गिलेशिकवे विसरून-
तुझ्या मिठित येईल म्हणते..!
पण मीच का..?
कदाचित,
तुही याच द्विधा मनःस्थितित..!
.....

फटाक्यांची आतिषबाजी बघायला
सवयीप्रमाणे दोघेही गच्चीवर,
अमावस्येला, संपूर्ण शहर उजळून निघाले आहे..!

विरहात दोघे..!!
तेव्हा नेमका कुणीकुणाचा हात पकडला
ते माहीती नाही,
पण,
गुंफलेले हात बघून,
कोपर् यातली पणती हळूच हसली,
तेवढं नक्की आठवते..!!