Tuesday 10 November 2015

आठवणीच्या खुणा

बोलताना त्याच्या डोळ्यात 
टचकन पाणी आले
घराच्या आठवणीने 
सारं घेरून टाकले 

सालं.! पैशामागे धावताना 
माणसं दुरावत गेली 
बत्तीसी आपली दाखवत 
त्याने ही खंत लपवली 

इथे लाखाचा संसार मांडला 
पण घरपण बाजारात मिळत नाही 
"आलास का बाळा घरी..?" 
तुळशीजवळचा दिवा आता विचारत नाही 

जसा थकत चाललो 
घराची ओढ वाढत चालली 
त्याच्या अंगणात तेव्हा 
चिंचेची सावली असावी हलली 

सांगत होता तो 
चिंचेचं झाड तेवढं उरलय 
आठवणीच्या खुणा पाहून-
बहुधा तेही जरा शिणलय





दिवाळी अंकात पुर्वप्रकाषित

भव्य प्रदर्शन आणि विक्री


परक्यांच्या चुका इथे झटक्यात आहे
माझ्या चुका तर सगळ्या बटव्यात आहे.

एका बाजूचे नाणे बाजार चालवतात इथला
विचार-बिचार इकडे सगळे फतव्यात आहे.

त्यांच्या पुस्तकात चुकाच  आहे फक्त
माझे विरोधी सगळे  वणव्यात आहे.

दाखवूनच देऊ आज तर सगळ्यांना
आपले ढोल ताशे सगळे दणक्यात आहे.

"ते तसं " केलेलं जमणार नाही
चालता फिरता मी सगळा लखव्यात आहे.

--वैभव


दिवाळी अंकात पुर्वप्रकाषित


Saturday 10 October 2015

नग्न-खुणा

तिच्या डोळ्यात,
तो नव्हता...!!
तीच-
पूर्ण ती-
त्याने नग्न सोडून दिलेली...
स्वत:च,
स्वत:च्या डोळ्यात सामावली होती..!!

त्याच्या,
तो होता याच्या-
फक्त खुणाच राहील्या होत्या..!!
डोळ्यातून कधी गळलेल्या
अश्रूच्या सुकण्याच्या..!!



Friday 18 September 2015

रिकामा देव्हारा

"रिकामा देव्हारा बघितला आहे कधी..?"
काय झाले..??
हो..हो..तुम्हालाच विचारते आहे मी.!!
काय बघितला आहे का रिकामा देव्हारा..?

मी बघितला काल..
दूरून मंदीर छान ताज्या फुलांनी (सकाळीच तोडले असतील) सजवले होते,
म्हटल बघाव काय म्हणतो आतला देव...

बाहेर काही वृद्ध भजनही म्हणत होती,
एक थकला बिचारा कुत्रा मान टाकून झोपलाही होता तिथेच..
विचित्र सर्व प्रकार भासत जरी होता..
तरी देव तिथला पाहायचा मोह फार दाटला होता..

मनाची ओढ पायात उतरली होती,
सुगंध तिथला आणखीच भर वाढवीत होता,
कुठला देव असा पुजला जात होता,
उत्सुकता वाढीस लागली होती..!!

आणि काय..??
तो देव्हारा रिकामा होता..!!

एक केस विस्कटलेली बाई (वेडी असावी हा माझा समज),
 बरळत होती-
मुर्तीत नाही रे तू..
इथेच आहेस...!!
अनंतात..
उद्या इथेही दगड येईल एक,
पुजारीही असेलच सोबत..!!
तेव्हा मला आत येऊ दिले जाणार नाही,
कुत्राही असा शांत झोपेल कसा..!!
ही भजने बेसुरी वाटतील..

(आता माझ्या डोक्यात शंका..
कोण वेड.? मी की ती...?)

...वैष्णवी..




Sunday 9 August 2015

बदल

"आपली पुन्हा भेट होईल, तेव्हा असाच ताटकळत उभा असशील ना रे माझ्यासाठी..??", ती भावनीक झाली होती.. "हा शेवटचा निरोप नाहीये तुझा-माझा! मी येईल परत... एक शेवटचा अलविदा म्हणायला..", ती जाताना बोलली होती तस..! आणि म्हणालीही होती, " बदलू नकोस हं.. असाच फुललेला सुगंधीच रहा..!!"

त्यानी उत्तर दिलच नाही तेव्हा.. तसाच तटस्थ उभा होता..

आज परत आली ती.. राहीलेला एक शेवटचा निरोप द्यायला.. पण.. तेव्हा तिच भानच नव्हत..तिथेच उभ्या असलेल्या त्याच्याकडे..
त्याला ओलांडून पुढे गेली आणि नकळत मागे वळून बघितल्या गेल.. तेव्हा तो म्हणाला, " मी तोच आहे.. थोड वय वाढल असेल फक्त..! पण तू गं.. तीच आहेस का..? मला सोडून गेलेली.."

तेव्हा आजुबाजुला तिनी बघितल,आता डोळसपणे.. खरच सर्व तसच होत..ती सोडून..बदलली होती ती.. आणि बदल होणारच होता, तिच्या कळत-नकळत.. निसर्गाचा नियमच ना तो... फक्त तो बदल तिच्या लक्षात आत्ता आला, त्यानी बोलून दाखवल्यावर...

आज.. तिच्याजवळ उत्तर नव्हते..पण त्याच्याकडे बघून ती फक्त हेच म्हणाली,"परतून चांगलच वाटल-पारिजातका..!"

तिच्या ह्या बदललेल्या आवेगाकडे बघून तोही जास्तच फुलला-एक बदल म्हणून..!

Thursday 28 May 2015

ते फेकलेले तुकडे



तो कसाई वरती फेकत असतो
ते सडत असलेले उरलेले मटणाचे तुकडे
आणि
आकाशातली घार उंची सोडून खाली ते झेलायला येते
तिच्या तोंडून खाली पडतात काही तुकडे
आणि
त्या खाली पडणाऱ्या  तुकड्यांसाठी धावत असतात काही कुत्रे .




..वैभव गुणवंत भोयर 

Saturday 23 May 2015

अनोळखी

ठिक आहे तर - निरोप
हा आपला शेवटचा
प्रवास दोघांचाही
इथेच आहे संपवायचा

जाता जाता एकदाच
आठवू पहीली भेट आपली
चालेल ना तुला
थोड्या भूतकाळाच्या गोष्टी ?

तू मला,
ओळखते तरी का?
हेच विचारलेले तेव्हा
आठवते का?

आपली ओळख
नावानीच झालेली आधी
भेट तर आपली
घडली फार पुढे कधी

हळूहळू संवाद दोघांचा
वाढायला लागला होता
तेवढ्यात सहवास दोघांचा
आवडायला लागला होता

नंतर वळण आपल्या नात्याला
नको ते मिळाले
आता दुरावा इतका वाढला
की बोलणे नकोशे झाले

ताण आपल्यातला
असा ताणायला नको होता
दोस्ता..!! हा तमाशा मैत्रिचा
व्हायला नको होता

पुन्हा आता दोघांना
दूर-दूर जावे लागेल
ओळखितही "अनोळखी"
दोघांना व्हावे लागेल


Thursday 21 May 2015

तिरस्कार

तुझ्याइतका भ्याड व्यक्ती-
बघितलाच नाही मी..!!
फक्त माझ्या शब्दांनीच,
एका चौकटीत स्वत:ला बांधून घेतलय तू..!!
स्वत:च्या डोळ्याला डोळे भिडवून,
एकतर-
असलेल्या भावनांची कबुली करता यावी..
आणि
झालीच आहे चूक तर-
निधड्या छातीने ती स्विकारली तरी जावी..
तू ,
यातलं काहीच करू शकत नाही..!!!
फक्त तू बरबाद व्हाव या माझ्या वाटण्यावरूनच -बिथरला आहेस तू..!
माझ्या चांगल्यासाठी-माझ्यासाठी-
हे सर्व करतोय..!!
अस चुकुनही बोलू नयेस..!!
कारण मी आताही,
तुझ्या नकारासहीत,
जे आहे ते,जशाच तसे-स्विकारलय..!!
तुलाच रे,
स्विकारता येत नाही आहे,
माझ्यातला तुझ्यासाठीचा - तिरस्कार..!!


Monday 4 May 2015

कालांतराने

खरच लहान आहेस गं तू,
कोवळ्या ,निरागस बालकाचे मन सांभाळले आहेस स्वत:मध्ये..!!
आपली आवडीची वस्तू जवळपास नसली,
किंवा कुणी हिरावून घेतली,
की-
ते बाळ कशे मुसुमुसु रडते!
अगदी घर डोक्यावर घेते..!
तूही तेच करत आहे,
त्या बाळाला ती वस्तू परत मिळाली की
जो अत्यानंद होतो,
रडणारे बाळ कशे एकदम आनंदून जाते..
तशे तुझे होउ शकत नाही पण..!!
मी खूप दूर निघून आलोय,
आणि तू तिथेच ताटकळत थांबली आहेस..
एक तर मोठी हो-
जे आहे त्याचा स्विकार कर..!
किंवा-
आवडली असली तरी कालांतराने
ते बाळ त्या वस्तूला विसरतोच की,
तुझ्यासाठीही ते कठीण जाणार नाही..

Friday 1 May 2015

नि:शब्द

मला बोलायचे होते तुझ्याशी,
तसे ठरवूनच भेटले होते मी..!
निवांत बसून,
आजवर लपवलेले सर्व गोष्टींचे गाठोडे
उलगडायचे होते मला..!!
न बोललेल्या शब्दांच्या मांडणीची उजळणी-
अगदी तू दिसेपर्यंत चालली होती..
काहीही मनात न ठेवता एकदाचे संपवायचे होते,
आपले जे काहीही नाते..
आपली भेट अशी संपायला नको होती...
माझे-तुझे हे शेवटचे भेटणे होते,
तू घाई घाईत निघून जायला नको होते,
असा नि:शब्द निरोप नको होता मला,
त्याच शब्दांच्या आतुरतेसाठी...!!


Monday 27 April 2015

नजरभरुन

तुला आठवते का रे..?
'आपली पहिली भेट'
तू जिन्याच्या पायर् या उतरताना,
मी खाली शांत उभी होती...
बाजुनी जणार् या ट्रेन च्या आवाजातही,
माझ्या हृदयाचं धडधडण मी ऐकत होती..

तूच होतास समोर-स्वप्न नव्हते..!
मी तुला स्पर्श करून, तशी खात्रीही केलेली..!
तेव्हा माझी नजर झुकली..!!
तू म्हणाला होता,
'एकदा बघ तरी नजरभरून -मीच आलोय..'
हिम्मत नव्हती,
भीती होती,
काय ते माहीती नाही,
पण-
माझी मान नकारार्थी हलली होती...

नंतर तिथल्याच जवळच्या कठड्यावर
बसलो होतो दोघेही..!!
'इतके दूर-दूर का बसलात'
 म्हणून खिडकीतून बघाणार् या मैत्रिणिने छळलेही होते..
खरतर तो दुरावा नव्हता..
हे त्यांना कळणार नाही,
समजावूनही कुणाला सांगायचे आहे..
तुला-मला कळाल,
झाल सर्व..!!

'बघ..! शब्द दिला होता ना, आलो मी..
तूच बोलत होता,
मी फक्त मान हलवत होती..
आनंदाच्या भरात शब्द कशे पळून जातात,
तेव्हा समजले..
नेमका वेळही खूप लवकर सरकतो..

तुला फोन आलेला कुठल्यातरी मित्राचा,
जावे लागणार होते,
आला तसा जाणार,
हे मलाही माहिती होते..

पण इतक्या लवकर..!!

'भेटतो नक्की उद्या'
जाताना पुन्हा एकदा शब्द दिला..

तू,
जिन्याच्या त्याच पायर् या चढताना..
मी तुझी पाठमोरी आकृती नजरभरून पाहत होती..

तेव्हा तू मागे वळून पाहीले होते का रे..?

आठवतय का..??
आपली पहीली भेट..!!


Saturday 25 April 2015

हूरहूर

तुला तर माहीतीही नसेल,
माझ्या मनाचा खेळ सारा...
हिच दुविधा आहे बघ..
मी बदल्याच्या भावनेने उफाळून आलेली असतानाच,
तू मला मिच शोधायला सांगितलेस..
आणि आता एक वेगळेच वळण...

ही शेवटची भेट असेल आपली..
दोघेही वेगळे असून एकच आहोत,
हे माहीती असतानाही-
वेळ झाली आहे रस्ते वेगळे करण्याची..

आता आपल जे काही नात आहे,
ते सांभाळायची जबाबदारी तुझी..
मला माझ्या प्रश्नांची उत्तरे सापडली दोस्ता..
आणि बाकी काही प्रश्नांना महत्वच उरले नाही..
स्वत:पासून स्वत: हरवेल कदाचित मी,
खूप मोठा,
मनाविरुद्धचा निर्णय...

पण
गरज म्हण हव तर,
स्वत:ची सावली शोधण्याची..!

या वेळी मी ठाम आहे,
फक्त हूरहूर लागली ती एवढीच,
तुला जमेल ना माझ्या निर्णयाचा आदर करायला..??




Saturday 7 March 2015

बोगनवेल

दिसायला नाजुक,
सुंदर अगदीच,
मन मोहवून वैगेरे टाकणारी..
शोभेची वस्तू..
इतकच महत्त्व पण- बोगनवेलीचं...!

तसच,
दूरून सर्व सुंदर आहे आपल्यात!
पाहणार् या च्या डोळ्यांना
छानच वाटावे असं..
जशे जवळ येवू-
तोच तो पणा जाणवेल,
सुगंध नाही,
रंग एकच-छटाही नाही..!!

प्रत्येकाच्या घरी अन मनातही
असतेच एक,
हवी पण नकोशी,
काटेरी पण तरलच - बोगनवेल..!!

कुणी एक भेटावा,
दावा करणारा..
त्याच्या जीवनातील बोगनवेल नकारणारा..

माझ्या - तुझ्या अंगणातील
त्याच वेलीची शपथ,
मुळासकट उखडून टाकेन,
घरातून आणि मनातुनही
तुझी -माझी...
....बोगनवेल...!!



Thursday 5 March 2015

डायरीतील एक पान

अथर्व
तिच्याशी लग्न करायचा माझा निर्णय अगदी पुर्ण बरोबर होता. माझं पहिलं प्रेम-आनंदी-आता माझी बायको, सहचारीणी.! तिला माझ्या मनातील कुठल्याही गोष्टीचे स्पष्टीकरण द्यावे लागत नाही. आमच्यात सर्व सुंदर आहे. कुठल्याही भावनांसाठी कधीच शब्दांची जुळवाजुळव करावी लागत नाही. खुप समजुतदार आहे ही- सुरवातीपासूनच-अगदी आमच्या पहिल्या भेटीपासून.! मध्ये झालेले वाद फारच नकळत्या वयात झालेले. त्यांना अर्थही नव्हता. फक्त एक नाममात्र दुराव्यची भिंत उभी राहीली होती. पण मी तीला लग्नाची मागणी घातली आणि त्यानंतर आम्ही दोघे कधीच वेगळे नव्हतो, कधीही वेगळे होणार नव्हतो..तीनी लग्नाला होकार देण्याआधीच मी तीला सुगंधा बद्दल सर्व सांगितले होते. आनंदी आणि माझ्यातल्या काही वर्षाच्या अंतरामुळे सुगंधा माझ्या आयुष्यात आली, मला आवडणारी माझी मैत्रिण.!
सुगंधा-तिची ओळख करुन देण्यासाठी 'गोंधळ' हाच योग्य शब्द असू शकतो. नेहमीच कुठल्या ना कुठल्या गोंधळात अडकलेली, साध्या-सरळ गोष्टींचा पण गुंता करणारी, शब्दांचा गोंधळ सारा, नंतर तो गोंधळ सोडवताना आणखी जास्त गुंता. माझ्याही भावनांची उलथापालथ करणारी तीच..! नकळत मला आवडायला लागली होती ती, तीलाही मी - कारण तिचे डोळे सांगायचे तशे, मी टाळायचो तिच्या भावनांना, मला तिच्यात अडकायचे नव्हते, प्रेम एकदाच होते मी या मतांचा आणि मला तर प्रेम होउन गेले होते, पुन्हा होणार नव्हते, किंवा होउ द्यायचे नव्हते.! जे काही होते..!!
सुगंधानी तिच्या भावना व्यक्त केल्यावर मी नकार दिला नाही किंवा होकारही दिला नाही. मी माझ्याच तिच्यासाठीच्या आणि आनंदीसाठीच्या या दोन भावनांमध्ये अडकलो होतो. नेमक प्रेम कुठल हे समजून घेण्यात गुंतलो होतो..प्रेम अस समजून घेतल्यानी कळत नाही हे तेव्हा समजल जेव्हा सुगंधा एका नाजूक क्षणी मला सोडून गेली. जाताना तिने नक्कीच मागे वळून बघीतले नसणार, कारण तेव्हा मी न देताही माझा नकार तिला मिळाला होता, मीही पाठलाग करु शकलो नव्हतो कारण माझ तिच्यावर नाही आनंदी वर प्रेम आहे, हे मला तेव्हा कळाले होते..
आयुष्य म्हणजेही साला गोंधळच असतो, हा गोंधळ तिनी एका क्षणात सोडवला.. प्रेम की  आकर्षण? आनंदी की सुगंधा.? ही सर्व प्रश्ने सोडवली आणि नाहीशी झाली. मी पुन्हा दिसली तरी तुला ओळखणार नाही हे वचन काहीही न बोलता देउन गेली..
........

आनंदी
दोघेच एकमेकांच्या धुंदीत, सातवे आसमानवर म्हणतात ना? त्या भावना आम्ही अनुभवत होतो. माझ्या गळ्यातले काळे मणी अथर्व च्या नावचे आहेत, किती मोठ भाग्य माझ.! दोन वेगळ्या विचारांचे, अगदीच दोन टोक असलेलो आम्ही एकमेकांचे झालोत!
सगळ स्वप्नवत: मिळाले मला! तो माझ्याकडे परत येईल अशे वाटतच नव्हते,आमच्यात दुरावेच तशे निर्माण झाले होते.. गैरसमजुतीनी जवळ जवळ आमच्यात कळस गाठला होता.
तरीही जुने वाद विसरुन तो आला, त्याने लग्नाची मागणी घातली. त्याला नाही म्हणायची हिंमत नव्हतीच माझ्यात, मला माझे आणि त्याला त्याचे पहिले प्रेम मिळाले..
अर्धांगिनी झाले मी त्याची..!
त्या दिवशी आम्ही बाहेर भटकत असताना, त्याने हातात हात पकडला होता! पहिला पाउस नुकताच पडून गेला होता. मातीचा मंद-मंद सुगंध सर्वीकडे दरवळत होता, आमच्या नेहमीच्या गप्पा रंगल्या होत्या. आमच्या पकडलेल्या हाताकडे जाणार् या - येणार् या लोकांच्या नजरा पडत होत्या, पण दोघे एकमेकांत इतके गुंतलो होतो की जगाचा विसर पडावा जणू..!
फक्त ती दिसेपर्यत, त्यानी मला पहील्याच दिवशी सांगितलेली ती-सुगंधा!
कधीही प्रत्यक्ष तिला पाहता आले नाही. आमच्या लग्नातही ती आली नव्हती. अथर्वनी तिचे केलेले वर्णन आणि मी तयार केलेली आकृती,अगदी तशीच आहे ती! बोलक्या डोळ्यांची अन अगदी बेफिकीर, सावळी थोडी आणि चंचलही. तिथल्या गर्दीतही स्वत:च्या साधेपणाने पटकण दिसणारी..!
अथर्वला ती आधी दिसली. तो थांबला आणि पर्यायाने मीही..त्याची नजर सुगंधावर स्थिरावली होती, कुठल्यातरी अपेक्षेत, तिनी ओळख दाखवावे ही साधी अपेक्षा कदाचीत! त्याच्या डोळ्यात एक वेगळाच आवेग मला दिसत होता, या आधी कधीही न पाहीलेला!
ती फोनवर कुणाशी तरी निर्मळ हसून बोलत होती आणि एका क्षणी त्यांची नजरानजर झाली.. तिच्या डोळ्यात तेव्हा शून्य भावना गोळा झाल्या, ती हसली नाही, दोन मिनटांआधी फोनवर लहान मुलासारखी हसणारी ती एकदम गंधीर झाली! तिनी त्याला ओळखले हे नक्की पण ती ओळख त्याच्या पर्यत पोहचू द्यायची नव्हती-हा तीचा अट्टहास! तिनी त्याची नजर चुकवली;ओळख लवपली.!
मी आमच्या हाताची मीठी सैल करतच होती, तर तीची ती नजर आमच्या दोघानी एकमेकांच्या पकडलेल्या हातावर होती. मी हात सोडवत होती अथर्वच्या हातातून, त्यानी बोलाव तिच्याशी, गुंता त्यांच्यातला सोडवावा एकदाचा. पण माझा निसटत जाणारा हात, तेव्हा त्याने घट्ट पकडला, आणखी घट्ट!!
खरतर, मी आता कुठेही त्याच्या पासून दूर जाणार नव्हती, पण त्यानी पकडलेल्या हातात ती भिती जाणवत होती.. त्यानी घट्ट पकडलेला हात तिनी बघितला- आणि सरळ चालली गेली, अनोळखी बनून..!!
.......

सुगंधा

माझ्यातले मी पण हरवता येत नाही आणि त्याला मी जशी आहे तशी स्विकारता आली नाही. "अथर्व, मी प्रेम करते तुझ्यावर." मी असे बोलली तेव्हा होकर किंवा नकार दोन्ही पैकी काहीही दिला नाही त्यानी..
मला माहीती होते, त्याला वाटते की, प्रेम एकदाच होते. दुसर् यांदा झाले तर, एकतर पहीले जे वाटले ते प्रेम नसते किंवा दुसर जे वटले ते तरी!  माझ्यावर की आनंदीवर कुणावर प्रेम करतो, हे त्याला समजत नव्हते. आणि हे त्यानी प्रामाणिकपणे मान्य करणे - या गोष्टीमुळेच मला तो जास्त आवडायला लागला! नाहीतर वाहत जाउन होकार दिला असता किंवा तावातावात नकार तरी, पण त्यानी दोन्हीही केले नाही. त्याला त्याचच मन समजत नव्हत, भावनांची उलथापालथ झाली होती..
त्याच्या गोंधळाचे उत्तर शोधण्यासाठी आणि पर्यायानी मलाही माझे उत्तर मिळवायचे होते.. गोष्टी मिळण्यापेक्षा मिळविण्याचा आनंद हवा असतो मला!
म्हणून, मी सिमा ओलांडायचे ठरवले. मला तो माझाच हवा होता, पण जबरदस्तीनी नाही. मनानी, त्याच्या मनानी! त्या दिवशी, office संपवून अथर्व मला भेटायला आला. तेव्हा मी त्याच्या खूप जवळ गेले. अगदी एकमेकांना आमचे श्वास एकायला येतील इतकी जवळ. माझ्या हातानी माझ्याही नकळत त्याला अलिंगण घातल होते, हृदयाचे धडधडणे वाढले होते,डोळे किलकिले झाले होते, वाटलच तो माझा आहे! एक क्षण सर्व थांबले होते, त्याचे डोळे मिटलेले होते, पुढच्या क्षणी त्याचे ओठ, माझ्या ओठांवर असतील कदाचित, तेव्हा हळू आवाजात तो पुटपुटला  "Love you, Aanandi."
त्याच्या मिठीत मी - ओठांवर तिचे नाव..! संपले सर्व, मला माझा नकार मिळाला! कदाचित त्याला त्याचे उत्तरही!! मला नकाराचे शब्द त्याच्या तोंडून एकायचे नव्हते. माझे अश्रू त्याला दाखवायचे नव्हते, माझ्याकडे तेव्हा एकच मार्ग होता, तिथून निघून जायचा, त्याला माझ्यात गुंतवायचे नव्हते आणि मलाही गोंधळ वाढवायचा नव्हता..!!
त्याचे आणि आनंदीचे लग्न झाले, मला आमंत्रण मिळालेले, पण कुठल्या तोंडानी जाउ!
त्या दिवशी ती दोघे अचानक पुढ्यात उभे राहीली.. ती आनंदी..! जीचा हात त्यानी घट्ट पकडला होता ती.. तीला मी माहीती तरी असेल का..?  काय विचार करत असेल ती माझ्याबद्दल..?? नुसता गोंधळ !!
त्यानी तिचा हात असाच घट्ट पकडून ठेवावा, त्याच्या आणि तिच्यात मला कधीही यायचे नाही. एक अनोळखी म्हणून किंवा एक मैत्रिण म्हणून पण नाही..!  काही घटकांच्या या नजर भेटीनी कुठलाही गोंधळ उडू नये.
.....

अथर्व

चुकून सुगंधाला असे तर वाटत नसेल ना की तीनी जे नको करायला हवे होते ते केलय..! आमची पुन्हा भेट होइल हे माहीती होते, मी आणि आनंदी सोबत असताना ती समोर उभी राहीली-योगायोगानेच..!
आनंदी ला कळाले होते की, माझी नजर जिथे खोळंबली तीच ती - सुगंधा, जिच्या मीही प्रेमात पडलो होतो. माझा पकडलेला हात सैल करत होती आनंदी, पण हे सुगंधाला आवडणार नाही हे माहीती होते मला, म्हणून आनंदीचा हात घट्ट पकडला मी..!
सुगंधा एकदा म्हणालेली आठवते,  प्रेम करावे, प्रेमात पडू नये! मी आनंदीवर प्रेम करतो आणि सुगंधाच्या प्रेमात पडलो आहे. सुगंधानी माझा गोंधळ सोडवला. त्यानंतर आमच्या नात्याला मैत्री वैगेरे नाव न देता दूर निघून गेली..!
.....

आनंदी

आमच्या गुंफलेल्या हाताकडे बघीतले आणि सुगंधा निघून गेली. पण तिनी वळून बघीतले आणि मिही! तेव्हा तिच्या डोळ्यात तिच अपेक्षा होती-साधी अपेक्षा! अथर्व मागे वळून बघेल हीच.. पण तो फक्त आमच्या हाताकडे बघत होता - समाधानानी..!!
तो-मी-ती..!!
त्यानी मला निवडले,नंतर तिनी त्याला कधीही न ओळखायचे ठरवले.! खूप जिद्दी आहे ती.! आता खरतर या काही वर्षानी तिनी बोलायला हवे होते त्याच्याशी..
तो वळून बघणार नाही ही खात्री झाल्यावर तिनी माझ्याकडे पाहीले! माझ्या नजरेत तिला काय दिसले तिच जाणे. फक्त ओठांनी नाही डोळ्यांनी देखिल हसली ती. गळत असलेली तिची आसवे दु:खाची, विरहाची किंवा वेदनेची नव्हती.. खर् या मैत्रिणीची होती, फक्त निर्मळ आनंदाची होती..
माझ्याकडे बघून हात हलवून ती निघून गेली. तिची पाठमोरी आकृती खूप आत्मविश्वासी वाटत होती.तिचा निर्णय बरोबर होता, आणि याचा पुरावा तीला मिळाला होता.
नंतर माझा पकडलेला हात आणखी घट्ट करून, मी आणि अथर्व  शांत चालत होतो.. चालताना अचानक तो थांबला, सुगंधा गेल्यानंतर पहिल्यांदा त्याने डोळ्यात-डोळे टाकून बघितले, माझ्याशी बोलला काहीच नाही, फक्त मिठित घेतले, आजुबाजुच्या लोकांचा विचारही न करता..
कदाचित तो तिच्या वेदना समजला होता. तिनी दिलेली त्याच्या प्रेमाची आहुती त्याला समजली होती.. जास्त गुंतायच्या आधीच दूर निघुन जायचा तिचा निर्णय संपूर्ण बरोबर होता. इतकी वर्ष ज्या कारणासाठी तो तिला दोष देत होता, ते चुकिचे होते, हे त्याला समजले होते...
......

अथर्व
आनंदीला मिठीत घेउन, माझे अश्रू लपवत होतो फक्त.. सुगंधा आवडणार् या माझ्यातल्या मला मीच कधी आवडू शकलो नव्हतो..त्या मला ह्या आनंदीनी काहीही तक्रार न करता स्विकारले..
माझ्या डायरित फडफडणार् या सुगंधा या  नावाच्या पानावर तीनी पण केले..
आणखी काय हवय मला..!!
.......

सुगंधा
नेहमीसारखाच तो वळून पाहणार नव्हताच, पण हा इतका माझा वळून बघायचा मोह मला आवरता आला नाही..
त्यानी नाही पण आनंदीनी वळून बघीतले खरे, याचा अर्थ ती ओळखते मला..!! जरी त्याच्या आयुष्यात मी नाही तरी त्याच्या डायरीचे एक पान माझ्या नावानी कोरलेले आहे! हे तिच्या डोळ्यात मला समजले. माझा राग नाही तिला, तीही माझ्यावर त्याच्या इतकेच प्रेम करते..!
या दैव योगात, माझ्या प्रश्नाला उत्तरे आणि त्याच्या डायरीत फडफडणार् या माझ्या नावाच्या पानाला खरा अर्थ मिळाला..!



...वैष्णवी..

Tuesday 20 January 2015

किनारा

एक व्यक्ती आहे,
माझ्यासाठी-माझं सर्वस्व..!
एक अथांग समुद्रच म्हणा ना..!

असा महासागर,
ज्याच्या खोलात जितकं शिरावं,
तितकं वेगळी, आणखी सुंदर दुनिया दिसते..!
पण तेव्हाच-
जिवंत राहण्यासाठी,
वर उंच हवेत येण्याची गरज असते..

असा समुद्र,
ज्याचा तळ सापडला
असं वाटत असतानाच,
धडपडत,
शोध अर्धा सोडून परतावे लागते..!

इतक्यात,
मी तळाशी जाणं बंद केलं आहे,
समुद्राला किनार् यावरुन,
मनसोक्त डोळ्यात भरता येतं..!
आणि जिवंतही राहता येतं..!

किनारा महत्वाचा असतो-बहुधा..!

मला,
माझ्या त्या,
समुद्राचा,
किनारा तरी बनता येईल का..?
त्याचा तळ गाठायचाच नाही,
तळात फक्त मोतीच राहतो,
तो हक्क माझा नाही...

मला फक्त,
त्याचा काठ व्हायचं आहे..
भरती-ओहोटी,
दोन्ही वेदना अनुभवायच्या आहे..
मला त्या समुद्राचा भाग नाही,
सखा व्हायचं आहे
-किनारा बनून.!