Friday 30 May 2014

का ते माहित नाही..!!

अशी ही दोन बहिणींची कहाणी..!!
                    
एकाच शेताच्या बांधावरच्या,
जणू दोन झाडांची कहाणी..!!

एकीत मुळातच कठोरपणा,
फक्त बाभळीचा काकटपणा..!!
दुसरीत मायेचा नेहमीच वसा,
चंदनासारखा फक्त सुगंध सारा..!!

एकीचे नशीबच जळण्यासाठी,
कोपऱ्यातील सारण होऊन सडण्यासाठी..!!
दुसरीनेही झीजनेच स्वीकारले,
पण दगडाच्या मूर्तीसाठी..!!

जाणारा वाटसरू,
काटा रुतला म्हणून,
बाभळीला दोष देतो..!!
पण चंदनाचा सुवासात
अगदी बेधुंद होतो..!!

शेताच्या एकाच बांध्यावरच्या,
बाभूळ अन चंदना सारख दोघींचं..!!

पटत पण पटत नाही..!!
कळत पण कळत नाही..!!

मुळे एकाच शेतात,
खोलवर रुतलेली..!!
पण स्वभावातील
विसंगती नेहमीच जपलेली..!!

बाभळीला काट्याचा तिरस्कार नाही..!!
चंदनाला सुवासाचा मोह नाही..!!

काही असण्याची,
काही नसण्याचीही
खंत नाही..!!

फक्त
शेताचा मालक तेवढा गोंधळला आहे..!!

का ते माहित नाही..!!

Sunday 18 May 2014

म्हणून माझ्या या हृदयात तू पुनः कधीही न यावे..!!

हे सारे त्याला गिरविण्याचे,परिणाम तर नसावे..!!
दिलेल्या जखमांचे,ज्याला शल्यही थोडे नसावे..!!

हेतुपरस्पे नव्हते कधीच त्याचे, पण म्हणून, 
निघून जाने त्याला कसे इतके सोपे असावे..??

पाण्यावर उठलेले तरंग छानच दिसतात,
त्याने तळाशी बुडालेल्या दगडाला ना विसरावे..!!

कुठल्याही वेदनेची फिकिर नाही,यात न वावगे, 
पण माझ्या वादळाला का मलाच जबाबदार धरावे..??

त्याला म्हणे पडत नाही सावल्यांचे प्रश्न कधीच,
मी मलाच द्याव्या लागणाऱ्या उत्तरांचे काय करावे..??

डोळ्यात साठलेले पाणी, ओठांनी कशे सांगू, कसे ना कळे, 
सांत्वनासाठी आल्यावर डोळ्यातील अश्रूचा अर्थ का पुसावे..??

भरवसा आता उरला नाही, माझाच मी असण्यावर, 
म्हणून माझ्या या हृदयात तू पुनः कधीही न यावे..!! 

Wednesday 14 May 2014

I Love You..!!


“कोण..??”, ऐकताना काही चूक झाली असेल म्हणून तिच्या आईला तिने पुन्हा हा प्रतिप्रश्न केला होता.


मयंक, हो त्याचाच कॉल आला होता. तुझ्याचविषयी विचारत होता, तुझा जुना मोबाईल नंबर त्याच्याजवळ होता म्हणून त्यानी या नंबर वर कॉल केला, तुझ्याशी बोलायचं म्हणत होता, म्हणून मी त्याला तुझा नंबर दिलं आहे, त्याचा एकदम कॉल आल्यावर माझ्यावरच चीडशील म्हणून मी आधीच सांगते आहे तुला..!!” तिची आई हे सर्व बोलताना ती फक्त स्वत:ला “मयंक..?? त्याचा कॉल..??” हे प्रश्न विचरत होती.. त्याच्या फक्त नावाने तिच्यासमोर तिचा भूतकाळ दत्त बनून उभा राहिला..


तोंडओळख मैत्रीत, आणि मैत्रीचे प्रेमात रुपांतर असा तिचा आणि त्याचा प्रवास सरसर डोळ्यासमोरून गेला..!!


“हा माझा मित्र, मयंक..!!”, तिच्या चुलत भावानी ओळख करून दिली,
तेव्हा फक्त “Hi” व्यतिरिक्त ती काहीही बोलली नव्हती.
नंतर बऱ्याचदा तो भावासोबत घरी यायचा, त्याचा स्वभाव मुळातच बोलका, त्याला बोलायला कुठली ओळख कुठलाच विषय लागायचा नाही, कुणाही सोबत,कुठेही तो बोलायला तयारच..!! या उलट ती फार लाजाळू, नजरही वर करून बोलायची नाही, साधी एकदम..!! खूप कमी बोलायची..!!


तो जितक्यांदा घरी आला, तेव्हा तोच बोलायला सुरवात करायचा, सुरवातीला ती ओशळायची,बोलताना दबकायची..!! पण वेळेनुसार त्यांची अनोळख मैत्रीत बदलली. तिचा तो चांगला मित्र झाला,घरी येण-जाण वाढलं, एकमेकांशी गुंतले गेले, प्रेमात पडले..!!तीन वर्षाच्या ओळखी नंतर त्यानी प्रेम व्यक्त केलं..!! ती तर जणू वाटच पहात होती त्या दिवसाची..!!


प्रेमात पडल्यावर जणू त्यांना स्वर्गच गवसला होता, त्यांच्या प्रेमाची भनक घरीही लागली होती, आणि घरच्यांचाही काही विरोध नव्हता, खूप कोवळ्या वयात ती दोघे प्रेमात पडली होती आणि हेच प्रेम जाणत्या वयापर्यंत जपलं होत.. आणखी ४-५ वर्ष प्रेमाला लग्नाच्या नात्यात बांधायला कुठेच अडथळा नव्हता..!!


पण नियती..!! तिचा खेळ आपण कधीच ओळखू शकत नाही..!! भविष्याची स्वप्ने ती दोघे रंगवत होती, नियतीच्या डावा पासून- अनभिज्ञ..!!

***

आणि एक दिवस, त्याचा मोबाईल बंद होता,तिच्या एक्झाम मुळे गेली १५ दिवस ती त्याच्याशी बोलली नव्हती,एक्झाम संपली आणि पहिला कॉल त्यालाच केला आणि मोबाईल बंद..!! “कसं शक्य आहे..??, काय झाल..??” तेव्हा हजार शंका-कुशंका पेटल्या होत्या..!!

त्याच्या घरी गेली, दाराला भलमोठ कुलूप. “का..?? कुठे गेला..?? जाताना कुणी कुणाला काही सांगितलंच नाही..!!”

तेव्हाच्या या प्रश्नांना तिनी त्यानंतर रोज उत्तरे शोधायचा प्रयत्न केला, पण कुठे काही सापडतच नव्हत.. काय झाल पंधरा दिवसात कुणालाही कशाचाच थांगपत्ता लागत नव्हता..!!

ती वाट पहात राहिली, नंतरचे पंधरा दिवस, एक महिना, तीन महिने, तिचा निकाल लागला ती पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला आली. कुण्याच्या येण्या-जाण्याने आयुष्य संपत नाही, आयुष्य नदीसारखं प्रवाही असतं,अडखळत पण थांबत नाही..!

पुण्याला आली, त्याच्या बंद नंबर वर रोजचा एक कॉल ठरलेला,चुकून तरी त्याला कॉल लागेल, उचलेल तो,कुठे आहे सांगेल.. अशीच आणखी पुढची ३ महिने निघून गेली.!

आणि आज त्याच मयंक चा कॉल..!!!!

***

त्याला भेटली तेव्हाची ती, त्यानी सोडली तेव्हाची ती, आणि आज पुन्हा भेटणार तेव्हाची ती..!! तो येईपर्यंत ती कठोर झाली होती..!! तिच्या आईने कॉल करून सांगितले तेव्हापासून ती वेड्यासारखी आपल्या मोबाईल कडे टक्क डोळे लावून बसली होती..!!

डोक्यात आणि मनात शून्य विचार होते, सर्व भावना सुन्न झाल्या होत्या ती निर्जीव झाली होती..!!

सायंकाळी आठ वाजता त्या बंद नंबर वर कॉल करायच्या सवयीने तिनी हातात मोबाईल घेतला आणि अनोळखी नंबर वरून कॉल आला! तिला खात्री पटली हा तोच आहे, हृदयाचे ठोके वाढले, डोळ्यात आसवे तरळली. तिच्या नकळत तिनी तो कॉल उचलला, तिला काही बोलायची गरज नव्हती आणि तिनी काही बोलावे अशी त्याची अपेक्षाही नव्हती. त्या दोघांमधली शांतताच बरच काही बोलून गेली..!!

एकमेकांचे आवाज ऐकण्यासाठी दोघही आतुर झाले होते पण शांतात जास्त हवीशी वाटत होती,पण समोरची व्यक्ती रडत नसावी ही इच्छा दोघेही मनात घेऊन होते..

शांतता तोडत तो म्हणाला, “रागावली आहेस..??” तेव्हा तिनी फक्त नाही अशी मान हरवली, त्याला दिसणार तर नव्हतेच,पण शब्द तर जणू तिच्या साठी हरवलेच होते..!!

तोच पुढे म्हणाला, “ बोलणार नाहीस..?? खूप काही बोलायचं आहे ना..?? खूप काही विचारायचं आहे ना..?? तुझ्याच प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कॉल केला आहे मी आज..!!मी कुठे गेलो असा..?? काय झाल कि अचानक नाहीसा झालो, वैगेरे.. प्रश्न आज माझ्या साठी महत्वाची नाहीत, फक्त एक गोस्ट नक्की तुला दुखवायचे म्हणून मी यातले काहीही केले नाही. मजबुरी होती माझी..!!इतके दिवस मी तुझ्या शिवाय कसा जगलो याचे स्पष्टीकरण द्यायची मला गरज नाहीये, फक्त एकच सांगेन खूप कमी वेळ राहिला आहे माझ्याजवळ..!! मी तुला धोका वैगेरे दिला असे वाटू नये म्हणून मी हा कॉल केलेला आहे..”

तो बोलताना ओघळणारे अश्रू, कानावर पडणारे त्याचे शब्द आणि गेल्या सहा महिन्यात अधे-मधे त्याच्या बद्दलच्या ऐकलेल्या काही अफवा यांचे संदर्भ ती लावत होती. आणि या संदर्भातून गेल्या सहा महिन्यातली एक शृंखला जुळली होती..!! आणि आताशा तिला ‘माझ्या जवळ जास्त वेळ नाही’ चा अर्थ समजला होता..!

त्याचे बोलणे मध्येच थांबवून ती, “आता आहेस कुठे तू..?? मी येते तिथे,बाकी काहीही बोलू नकोस..!!” तिच्या आवाजानी तो अगदीच तृप्त झाला..!!

तो, “काय करणार तू हे सर्व माहिती करून..!! काय करणार तू माझ्याजवळ येऊन..!! उलट त्यानी सर्व गोष्टी कठीण होऊन जातील दोघांसाठीही..!!”

ती हे सर्व समजण्याच्या मन:स्थितीच नव्हती..!! ती, “मला हे काहीही माहिती नाही, तू फक्त मला सांग..!!”

तो शांत..!!
आणि आता तीही शांत..!!

त्याला भेटण्याचा आवेग किती दाटला हे तिचे तिलाच माहिती,तिनी भेटावे ही तीव्र इच्छा असतानाही नाही म्हणतानाचा त्रास त्यालाच माहिती..!!

 पुन्हा दोघातील शांततेचा भंग करताना तो, “आजही आवडतो मी..?? आजही प्रेम करते माझ्यावर..??”

ती, “नाही..!! नाहीच करत..!! तुझ्यावर प्रेम करण्यासाठी काही कारण ठेवलय का तू..??”

तो, “माझ्याजवळ जीतके दिवस राहिलेत तितके दिवस रोज मी तुला हा प्रश्न विचारणार.. कुठलही कारण असावं असं आपलं प्रेम नव्हतच..!! तेव्हा मी प्रेम व्यक्त केलं होत आता तुला करायचे आहे..!! तू जे आता बोललीस ते फक्त रागात हे समजतय मला, फक्त राग बाजूला ठेवून म्हण कि तू आजही प्रेम करतेस माझ्यावर..!! U still love me...!!”

ती, “नाही करत..!! नाहीच..!!”

दबलेला हुंदका निघालाच, तोही अश्रूमय झाला..!!

तो, “उद्या बोलू.. करतो कॉल..”

पण नियती..!! नियतीचा खेळ..!! तिच्या प्रत्येक डावापासून अनभिज्ञ असतो आपण..!!
***


त्याचा कॉल ठेवून जास्तीत-जास्त एक तास झाला असेल, तिच्या चुलत भावाचा sms आला, “Mayank is no more”

तिच्यावर आभाळ फाटल्यासारख ओझं कोसळलं – न बोललेल्या शब्दांचे, असतानाही व्यक्त न केलेल्या प्रेमाचे..!

तो गेला..!!सर्व संपल..!! उद्या बोलताना हे बोलेल ते बोलेल अशी रंगलेली स्वप्ने अशी क्षणात तुटली..!! त्याच्या मृत्युनंतर ती ओक्साबोक्सी रडेल असे तिलाही वाटत होते पण तिची इच्छा असतानाही डोळ्यातून एकही अश्रू गळत नव्हता..!!

त्याला फक्त “I Love You” ऐकायचे होते आणि ती फक्त हेच बोलू शकली नाही..!! तिला फक्त तिरस्कार जाणवत होता, स्वत:चा, न बोलल्याचा, बोलल्याचा, प्रेमाचा ,शब्दांचा आणि स्वत:च्याच रागाचा..!!

या तिरस्काराखाली मात्र एक मन ओरडून ओरडून सांगत होते, “I Love You..!! I Really Do..!!”



Wednesday 7 May 2014

एकदा त्याने आरशाला विचारले

एकदा त्याने आरशाला विचारले,
“कसा दिसतोय..??"
त्याने स्वत:च्या डोळ्यात खोलवर पहिले,
थोडा भ्यायालाच, कारण-
त्याला दिसली नाही आपल्या,
डोळ्यात पूर्वी सारखी चमक..
आणि-
नव्हती त्याचा आवाजात, नेहमीची धमक..

पुन्हा एकदा, त्याने आरशासमोर डोळे विस्फारले..!!
म्हणाला, “काय बघतोय..??"
आणि डोळ्यात त्याला दिसले-
करत असलेले आपणच परिवाराचे हाल,
आणि गमावलेले स्वत:चे गाल..!!
त्याला आठवत होता त्याचा हरवलेला काल..!!
पण तेवढ्यातच चुकचुकली भिंतीवरची पाल..!!

पुन्हा एकदा,
त्याने आरशामध्ये डोकावले..!!
आता त्याने काय बर पहिले..??
भिंतीवरील हसत होते जाळ,
कानाजवळ वाजत होते टाळ,
जणू जवळ येत होता त्याचा काळ..!!

पण अचानक,
पुन्हा एकदा, त्याने आरशात पहिले..
तेव्हा हसत होता त्याच्या समोरचा आरसा,
त्याला चिडवत होता त्याचा तो आसरा..!!
 हातात असलेल्या दारूच्या बाटलीने,
आपल्या दारिद्र्याच्या कारणाने,


त्याने केले आरशाचे तुकडे तुकडे..!!
नशिबही तसेच फुटके फुटके..!!
आता तर,
हसत होते आरशाचे शंभर तुकडे,
रडत होते नशीब बिचारे फुटके,

आणि जवळच,
मिसळत होते-
डोळ्याचे पाणी, दारूच्या प्रवाहात..!! 




[२००९]

Sunday 4 May 2014

मी सर्व लढाई खरेपणाने जिंकणार आहे..!!

एक खेळ बदनामीचा, मीही खेळणार आहे..!!
मनात लपवून ठेवलेला, बदला घेणार आहे..!!

तू विना चेतावनी, मला उद्वस्त केले जरी,
सरसकट मी आज तुला, आव्हान देते आहे..!!

मला दोष देत,निघून जाने, इतकेही सोपे नसणार,
एका-एका अश्रूचा हिशोब, मी घेणार आहे..!!

प्रचंड सुडाची आग खदखदत आहे खरी,
पण प्रेमाच्या जखमा मी प्रेमानीच देणार आहे..!!

मनात जो दिसतो तो फक्त रागच नाही,
तिरस्कारही, मी तुझ्यासाठी सांभाळला  आहे..!!

जन्मभर सोसाव्या लागतील तुलाही काही वेदना,
जाताना याची खात्री,मी नक्की करणार आहे..!!

तुझ्यासारखी खोटेपणा वर माझी नीव नाही,
मी सर्व लढाई खरेपणाने जिंकणार आहे..!!